निश्चित लक्ष्य गाठण्यासाठी ध्येयावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे : भाग्यश्री आत्राम

आलापल्लीत रात्रकालीन व्हॉलीबॉल स्पर्धा

आलापल्ली : क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून ज्यांनी नैपुण्य प्राप्त केले ते यशस्वी झाल्याचे दिसून येतात. खेळाच्या माध्यमातून केवळ मनोरंजन न करता आपल्याला गतिमान चातुर्य टिकवून ठेवण्यासाठी कसरत करावी लागते. क्रीडा क्षेत्रात नावलौकिक करायचा असेल तर कठोर परिश्रमाची गरज आहे. जे अडचणींवर मात करून पुढची पायरी शोधतात तेच यशस्वी होतात. त्यामुळे निश्चित ध्येय गाठण्यासाठी लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केले.

आलापल्ली येथील क्रीडा संकुल मैदानात स्व.राकेश कन्नाके स्मृर्तीप्रित्यर्थ एकता व्हॉलीबॉल क्लब आलापल्लीतर्फे आयोजित भव्य रात्रकालीन व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी सहउद्घाटक म्हणून माजी पं.स. सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच शंकर मेश्राम, उपसरंच विनोद अक्कनपल्लीवार, माजी जि.प. सदस्य लैजा चालुरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, ग्रा.पं.सदस्य पुष्पा अलोने, मनोज बोलुवार, सोमेश्वर रामटेके, स्वप्निल श्रीरामवार, छाया सप्पीडवार, राकाँचे वासुदेव पेद्दीवार, नागेपल्लीचे ग्रा.पं. मलरेड्डी येमनूरवार, सदस्य कैलास कोरेत, सांबय्या करपेत, बालाजी गावडे, पराग पांढरे, सुचिता खोब्रागडे, इरफान शेख, संजय मडावी, इम्रान पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रो कबड्डी आणि आयपीएलमुळे खेड्यापाड्यातील खेळाडू समोर येत आहेत. त्यामुळे कुठलेही खेळ असो, नियमित सराव करा आणि मिळालेल्या संधीचे सोनं करा, असे आवाहन भाग्यश्रीताई यांनी यावेळी केले.

या स्पर्धेसाठी उत्कृष्ट पारितोषिक आणि शिल्ड देण्यात येणार असल्याने मोठ्या प्रमाणात व्हॉलीबॉल चमुंनी सहभाग घेतला. उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी व्हॉलीबॉल खेळत मैदान गजविले.