काश्मिरमधील हल्ल्यातून थोडक्यात बचावले गडचिरोलीचे 43 पर्यटक

तासाभरापूर्वी सोडले 'ते' घटनास्थळ

काश्मिरमध्ये पर्यटन करत असलेले गडचिरोलीचे पर्यटक
याच ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला. हल्ल्याच्या एक तासापूर्वी तिथे असलेले गडचिरोलीचे पर्यटक

गडचिरोली : संपूर्ण भारतालाच नाही तर जगाला हादरवून सोडणाऱ्या जम्मू-काश्मिरच्या पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यातून गडचिरोलीचे पर्यटक अगदी थोडक्यात बचावले. हा हल्ला होण्याच्या जेमतेम एक तासापूर्वी त्यांनी ते घटनास्थळ सोडले होते. आणखी एक ते त्याच ठिकाणी असते तर काय झाले असते…? नुसता विचार करूनच त्या पर्यटकांसह त्यांच्या कुटुंबियांच्या काळजात धस्स झाले. पण नशिब बलवत्तर म्हणून की काय, ते सर्वजण सुखरूप बचावले.

या पर्यटकांमध्ये गडचिरोलीतील काही सेवानिवृत्त नायब तहसीलदारांच्या कुटुंबियांसह एकूण 43 जण आहेत. ते सर्वजण सोबतच उत्तर भारतात पर्यटनाला गेले आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांना भितीने ग्रासले असले तरी सर्व लोक सुखरूप आहेत, असे सेवानिवृत्त नायब तहसीलदार गणपत सोरते यांनी काश्मिरमधून ‘कटाक्ष’सोबत बोलताना सांगितले.

गेल्या 11 एप्रिल रोजी गडचिरोलीतील ज्येष्ठ नागरिकांसह इतर पर्यटकांचा जत्था एका ट्रॅव्हल एजंटमार्फत रेल्वेने उत्तर भारताच्या पर्यटनाला निघाला होता. मथुरा, आग्रा, कटरा, वैष्णोदेवी असे करत हे पर्यटक श्रीनगरला पोहोचले होते. तेथून सोनमर्ग, गुलमर्गमधील निसर्गाचा आनंद घेतल्यानंतर घटनेच्या दिवशी, म्हणजे मंगळवारी (दि.22) ते पहलगामला पोहोचले. तेथून घोड्यावर बसून ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन घाटीत पोहोचले. तेथील डोळ्याचे पारणे फेडणारे नैसर्गिक सौंदर्य पाहून आणि विरंगुळा झाल्यानंतर हा जत्था पुन्हा घोड्यावरून खाली पहलगामला आला. तेथून पुढचे स्थळ चंदनवेली येथे जाऊन त्यांना परत श्रीनगरला मुक्कामी जायचे होते. पण चंदनवेलीला पोहोचत नाही तोच दहशतवादी हल्ल्याची माहिती त्यांना देण्यात आली आणि लगेच माघारी येण्याची सूचना करण्यात आली.

ज्या ठिकाणावरून काही वेळापूर्वी आपण परतलो त्या ठिकाणी अशी काही घटना घडली यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. ‘हा हल्ला झाला त्यावेळी आपण तिथे असतो तर…!’ मनात डोकावलेल्या त्या कल्पनेने डोकं सुन्न झालेल्या अवस्थेत ते सर्वजण श्रीनगरच्या दिशेने रवाना झाले.

काश्मिरी लोक म्हणाले, ‘घाबरू नका, आमच्या घरी राहा’

घाबरलेल्या गडचिरोलीकर पर्यटकांना त्यांच्या गाडीचा चालक असलेल्या काश्मिरी मुस्लिम नागरिकाने धीर दिला. आमची रोजीरोटी तुमच्या भरवशावर आहे. तुम्ही घाबरू नका. आम्ही तुम्हाला मदत करतो. गरज पडल्यास आमच्या घरी सुरक्षित राहा, अशा शब्दात काश्मिरी मुस्लिम नागरिकांनी पर्यटकांना हिंमत दिली. पण काश्मिरमधील टूर आटोपता घेत गडचिरोलीकर पर्यटकांचा जत्था बुधवारी सकाळी जम्मूच्या दिशेने रवाना झाला. तेथून अमृतसर, दिल्लीमार्गे हे पर्यटक नियोजित दौरा पूर्ण करून गडचिरोलीला परतणार आहेत.