खरीप हंगामातील धानाची उचल न केल्याने रबी हंगामातील धान खरेदीला फटका

आ.गजबे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे कैफियत

देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगाम 2023-24 मध्ये कोट्यवधी रुपये किमतीचे लाखो क्विंटल धान खरेदी करण्यात आले. सदर धानाची उचल करण्यात न आल्याने रबी हंगामातील धान खरेदी अडचणीत आली आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता लक्षात घेता खरीप हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धानाची यथाशिघ्र उचल करावी, अशी मागणी आरमोरी क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी जिल्हाधिकारी संजय दैने यांच्याकडे केली आहे.

जिल्ह्यात खरीप हंगाम 2022-23 मध्ये आदिवासी विकास महामंडळ आणि मार्केटिंग फेडरेशनमार्फत कोट्यवधी रुपये किमतीची धान खरेदी करण्यात आली आहे. मात्र संबंधित कार्यालयासोबत रितसर करारनामे करून स्थानिक राईस मिलर्सकडून भरडाई करण्यासाठी धानाची उचल करण्यात आली नसल्याने कोट्यवधी रुपये किमतीचा धान केन्द्रांच्या परिसरात, किरायाने घेतलेल्या गोदामात तर हजारो क्विंटल धान उघड्यावर पडून आहे.

दरम्यान धान खरेदी सुरु होण्यास आता 7 महिन्यांचा कालावधी लोटल्याने मोठ्या प्रमाणात घट-तुट येण्याची शक्यता आहे. याशिवाय अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात धान खराब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशात शासकीय स्तरावरुन खरेदी करण्यात आलेले कोट्यवधी रुपये किमतीचे धान वेळेत उचल न केल्यामुळे शासनासह संबंधित खरेदी विक्री संस्थांना देखील जबर फटका बसण्याची शक्यता आहे.

यासोबतच आधिच खरेदी करण्यात आलेला धान केंद्रांवर तसाच पडून असल्याने रबी हंगामातील धान खरेदीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेतकऱ्यांना खुल्या बाजारात धानाला आधारभूत किंमत मिळत नसल्याने व अद्यापही शासकीय धान खरेदी सुरु करण्यात न आल्याने शेतकऱ्यांमध्ये शासनाप्रती संताप व्यक्त करण्यात येत आहे. या नुकसानीमुळे शेतकरी अधिकच अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे. ही गंभीर बाब लक्षात घेता जिल्ह्यात संबंधित अभिकर्ता संस्थेमार्फत खरेदी करण्यात आलेल्या धानाचे रितसर करारनामे केलेल्या राईस मिलर्सना भरडाईकरीता देऊन धानाची यथाशिघ्र उचल करण्याची मागणी आमदार गजबे यांनी जिल्हाधिकारी दैने यांच्याकडे केली आहे.