पाणी पुरवठ्याची कामे मुदतीत पूर्ण करा, अन्यथा कंत्राटदारांसह अधिकाऱ्यांवरही कारवाई

मिशनच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

गडचिरोली : पाणी पुरवठा हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असून जिल्ह्यात पाणी पुरवठ्याची कामे मुदतीत पूर्ण न करणाऱ्या व निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिले. यासोबतच कामे गुणवत्तापूर्ण न झाल्यास कंत्राटदारांसोबतच संबंधित शासकीय अधिकाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्याबाबत गंभीर दखल घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन पाटील, वरिष्ठ भूवैज्ञानिक अभिजीत धाराशिवकर उपस्थित होते.

नागरिकांना तातडीने पाणी मिळावे यासाठी कोणत्याही परिस्थितीत योजनेच्या कामांना उशिर होऊ नये. ग्रामीण व दुर्गम भागात पावसाळ्यातही कामे बंद पडू नये याची दक्षता घेऊन रेती, गिट्टी, सिमेंट आदी साहित्यसाठा आताच उपलब्ध करून घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवावे व संबंधित विहिरींवर उंच कठडे आणि जाळी लावून ते सुरक्षित केले असल्याची खात्री करून घेण्याचे त्यांनी सूचित केले.

1082 पैकी 929 योजना पूर्ण

ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन पाटील यांनी जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची माहिती दिली. जिल्ह्यात एकूण 1082 मंजूर पाणीपूरवठा योजनांपैकी 929 पूर्ण, तर 153 प्रगतीपथावर आहेत. तसेच आदीम जमातीसाठीच्या पीएम जनमन योजनेतील 126 पैकी 44 योजना पूर्ण, तर 82 योजना प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीला जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधीकरणचे संबंधित अधिकारी, तसेच कंत्राटदार उपस्थित होते.