दिव्यांगांच्या पुनर्वसनात गडचिरोलीत झालेल्या कामाची देशपातळीवर दखल

राष्ट्रपतींच्या हस्ते ३ डिसेंबरला होणार सन्मान

गडचिरोली : दिव्यांगांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयाच्या दिव्यांग सशक्तीकरण विभागातर्फे देशपातळीवरील पुरस्कारासाठी आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. आदिवासी पाड्यावरील दिव्यांग बांधवांना घरपोच दिव्यांग प्रमाणपत्र वितरित करणारा गडचिरोली हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पहिला आदिवासी जिल्हा ठरला आहे. त्याची दखल घेत राष्ट्रीय पातळीवरील प्रथम पुरस्कारासाठी गडचिरोलीची निवड करण्यात आली आहे.

या प्रमाणपत्रामुळे दिव्यंगत्वाशी झुंजणाऱ्या आदिवासी बांधवांना विविध योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जागतिक दिव्यांग दिनाचे निमित्त साधून येत्या 3 डिसेंबरला राजधानी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते गडचिरोली जिल्हा प्रशासनाला या पहिल्या पुरस्काराने गौरविले जाणार आहे.

यु.डी.आय.डी. प्रमाणपत्र वितरण, दिव्यांग बांधवांसाठी केंद्र आणि राज्य सरकार राबवित असलेल्या विविध योजनांची जनजागृती, दिव्यांगांची क्षमता बांधणी, पुनर्वसनात्मक योजना, साधनांचे वाटप अशा विविध निकषांमध्ये गडचिरोली जिल्ह्याने बाजी मारत हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावला आहे.

गडचिरोलीचे विद्यमान जिल्हाधिकारी संजय मीना, जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या संकल्पनेतून व मिशन इंस्टिस्टयुट फॉर ट्रेनिंग, रिसर्च अँड अँक्शन (मित्र) संस्थेद्वारा संचालित गडचिरोली जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प संचालक अभिजित राऊत यांच्या सहकार्याने दोन टप्प्यात हे अभियान राबविण्यात आले. पहिल्या टप्प्यात मनुष्यबळाच्या प्रशिक्षणासह 30 ठिकाणी प्राथमिक तपासणी शिबिरे आणि दुसऱ्या टप्प्यात 18 ठिकाणी शिबिरे आयोजित करून दिव्यांग व्यक्तींना घरपोच प्रमाणपत्र देण्यात आले. यात सरकारी यंत्रणेतील अधिकाऱ्यांपासून ते गाव पातळीवरील ग्रामपंचायत सदस्यांसह लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, संघटनांचे प्रतिनीधी आणि सर्वसामान्यांचा सक्रिय सहभाग हे या अभियानाचे एक वैशिष्ट्य ठरले.

तीन महिने चाललेल्या या अभियानात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रुडे, विद्यमान शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सतीशकुमार सोळंके, ग्रामीण रुग्णालयातील सर्व तज्ज्ञ डॉक्टर्स, तालुका आरोग्य विभाग, पंचायत समिती अंतर्गत सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, ग्रामसेवक, आशा, आशा गट प्रवर्तक तथा समन्वयक समग्र शिक्षा अभियान तसेच मित्र संस्थेचे अध्यक्ष, सचिव तथा पदाधिकाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.