अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह तर होणार नाहीत ना? यंत्रणा सतर्क

हेल्पलाईन 1098 वर संपर्क साधण्याचे आवाहन

गडचिरोली : अक्षय तृतीया हा महत्वाचा मुहूर्त मानला जात असल्याने या दिवशी अनेक ठिकाणी सामुदायिक व एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात. यामध्ये बालविवाहाचे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग नवी दिल्ली यांच्याकडून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्याबाबत केंद्र व राज्य शासनाकडून निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित यंत्रणा सतर्क झाली आहे.

18 वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या पुरुषाने अल्पवयीन वधुशी विवाह केल्यास त्या पुरुषाला दोन वर्षापर्यंत सक्तमजुरीची शिक्षा आणि 1 लाख रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. जाणीवपुर्वक बालविवाह ठरविल्यास त्यासाठी सोहळा पार पाडल्यास किंवा प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्ती तसेच संबधित वर-वधु यांचे आई-वडील किंवा पालक, अन्य नातेवाईक व मित्रपरिवार, धार्मीक स्थळाचे विश्वस्त, फोटोग्राफर, प्रिंटीग प्रेस, वाजंत्री, लग्न सभागृहाचे व्यवस्थापक, कॅटरिंग अशा सर्वांनी हा विवाह घडविल्यास प्रत्यक्षात मदत केल्यास त्यांनाही शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे.

दि.10 मे 2024 रोजी अक्षय तृतीया आहे. या दिवशी संभावित बालविवाहाच्या घटना थांबविण्यासाठी सर्व यंत्रणांनी बालविवाह प्रतिबंध अधिनियमातील तरतुदीनुसार प्रयत्न करावा व याबाबत प्रशासनाला माहिती द्यावी. बालविवाहाबाबतची माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन 1098 गडचिरोली, या नंबरवर कळविण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी केले आहे.