बालमृत्यू, आजारपण कमी करण्यासाठी आरोग्य विभागाचे विशेष मिशन

इंद्रधनुष 5.0 मोहिमेचा धानोरा तालुक्यातून शुभारंभ

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सीईओ आयुषी सिंग, डीएचओ डॅा.साळवे

गडचिरोली : बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी, बालकांचे व त्यांच्या मातांचे संपूर्ण लसीकरण करणे महत्वाचे आहे. त्यामुळे नियमित लसीकरणापासून सुटलेले बालके व गरोदर मातांचे संपूर्ण लसीकरण करुन त्यांना संरक्षित करण्याच्या दृष्टीने विशेष मिशन इंद्रधनुष 5.0 मोहिम राबविली जाणार आहे. त्याचा शुभारंभ सोमवारी (दि.७) धानोरा तालुक्यातील गोडलवाही प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आला.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दावल साळवे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.स्वप्निल बेले, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुनील मडावी, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ.विनोद मशाखेत्री, धानोराचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सखाराम हिचामी, वैद्यकीय अधिकारी डॉ.उपलेंचवार, डॉ.कुणाल मोडक व जिल्हास्तरीय व प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांनी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यक्षेत्रातील पात्र बालके व गरोदर माता लसीकरण मोहिमेमधून सुटणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले. या कार्यक्रमानंतर त्यांनी शाळकरी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दावल साळवे यांनी प्रास्ताविकात नियमित लसीकरणाचे महत्व पटवून दिले. त्याचप्रमाणे सामान्य जनतेने विशेष मिशन इंद्रधनुष 5.0 मोहिमेचा लाभ घेऊन बालके व गरोदर माता यांना सुरक्षित करण्याचे आवाहन केले.

या वर्षात 3 टप्प्यामध्ये राबविल्या जात असलेल्या या मोहिमेचा पहिला टप्पा 7 ते 12 ऑगस्ट 2023 दरम्यान राबविण्यात येत आहे.